Friday 2 October 2020

युट्युबर व्हा, करिअर घडवा.

 
 
मित्रांनो आज मी ज्या वळणावर आहे तो केवळ तुमच्यामुळे, तुम्ही आहात म्हणून मी आहे. मी एक खेडेगावातील तरुण आहे. खेडेगाव म्हटले कि एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे अशिक्षित लोकांचा समूह होय मी देखील याच समूहातला आहे. जेंव्हा एखादी शासकीय योजना गावासाठी येते त्यावेळी त्या योजनेची माहिती प्रत्येक नागरिकांना होईलच असे नाही परंतु सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती माहिती लोकांपर्यंत पोहचविली तर नक्कीच नागरिक ती माहिती वाचतात आणि त्यांना शासकीय योजनेची माहिती मिळते.शेतकऱ्यांसाठी बऱ्याच शासकीय योजना असतात परंतु त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही, मी देखील शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी बराच प्रयत्न केला पण केवळ माहिती न मिळाल्यामुळे मला काही योजनांच लाभ घेता आला नाही आणि या गोष्टीची सल सारखी मनाला टोचत होती कि आपण एवढे शिकलो (B.com) असून देखील आपण एखाद्या योजनेचा लाभ घेऊ शकत नसेल तर मग गावातील नागरिकांचे काय हाल आहेत. 

 

मी एका खाजगी ठिकाणी नोकरी करत असल्यामुळे मला हे काम करण्यासाठी वेळ मिळत नसे मग मी फावल्या वेळेत हि सर्व माहिती शोधून ती फेसबुक आणि व्हॉट्सअप या समाजमाध्यमांवर शेअर असे परंतु नंतर माझ्या लक्षात आले कि या गोष्टीला आकार देणे गरजेचे आहे. मग मी माझे युट्युब चॅनल सुरु करण्याचे ठरविले आणि मग सर्व शासकीय योजनांची माहिती असो किंवा नोकरीची माहिती असो किंवा इतर महत्त्वाची माहिती असो मी ती व्हिडीओद्वारे माझ्या युट्युब चॅनलवर प्रकाशित करू लागलो. खाजगी नोकरी करत असल्यामुळे त्यावेळेस या सर्व गोष्टींना वेळ मिळत नव्हता परंतु रात्रीच्या वेळत किंवा सुट्टीच्या दिवशी जमेल तसे माहितीचे व्हिडीओज मी माझ्या डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर प्रकाशित करत राहत होतो त्यानंतर मला माहिती मिळाली कि युट्युबद्वारे आपण पैसे देखील कमावू शकतो.
 
    

युट्युबच्या व्हिडीओमुळे पैसे मिळतात हे मला २०१८ या वर्षामध्ये माहिती पडले आणि मग मी ती सर्व प्रक्रिया समजावून घेतली. युट्युब मॉनिटाइजेशन ॲडसेंस ॲप्रोव्हल मिळविण्यासाठी गुगलकडे ॲडसेंसकडे अर्ज करावा लागतो आणि मग गुगलकडे ॲडसेंस ती सर्व माहिती तपासून मान्यता देतात.  मी दोन वेळेस ॲडसेंस ॲप्रोव्हलसाठी अर्ज केला पण माझा अर्ज नाकारला गेला मात्र तिसऱ्या वेळेस माझा अर्ज मंजूर झाला आणि माझ्या युट्युब चॅनलला पैसे कमविण्याची संधी निर्माण झाली. खाजगी नोकरी करत असल्यामुळे मला व्हिडीओ तयार करण्यास वेळच मिळाला नाही त्यामुळे युट्युबला पाहिजे तेवढा वेळ मी देऊ शकलो नाही. मला लिखाणाची देखील आवड होती आणि अजूनही आहे. मी २०१४ मध्ये गुगल ब्लॉगस्पॉट वर एक मोफत ब्लॉग निर्माण करून माझ्या सोशल मिडियावरील लेखनाचा श्रीगणेशा केला होता आणि त्यावर 200 ते 300 ओळीपर्यंत कंटेंट लिहायला सुरुवात केली पण या मोफत उपलब्ध असलेल्या ब्लॉगलाखूपच कमी प्रतिसाद मिळत होता. पुन्हा मझ्या असे लक्षात आले कि स्वतःचे डोमेन नेम खरेदी करून जर वर्डप्रेसवर या सी एम एस वर ब्लॉग बनविला तर ब्लॉगला SEO ( Search Engine Optimization ) करून ranking करता येईल मग मी डिजिटल डीजी हा माझा ब्लॉग बनविला परंतु SEO हा विषय खूप मोठा असल्यामुळे मला ते काही जमले नाही परंतु म्हणतात ना चालायला लागले कि रस्ता आपोआप सापडतो त्याच प्रमाणे मला वेबसाईट संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी औरंगाबाद येथील माझे एक स्नेही यांनी खूप मदत केली. ब्लॉग आणि युट्युब चॅनल दोन्ही माझे सुरु होते परंतु त्याकडे मी कधी करिअर म्हणून बघितलेच नाही. सोशल मिडियामुळे अमेरिकेची सत्ता बदलली...ज्या सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग केल्यास सत्ता बदलू शकते हे भारताने २०१४ च्या निवडणुकीत बघितले... फ्रान्समधील, यलो वेस्ट चळवळ (yellow vest movement) हा सोशल मिडीयाचाच भाग होता. एवढे असतांनाही जर तुम्ही सोशल मीडियाकडे करिअर म्हणून बघत नसाल तर मला वाटते सोशल मिडीयाच्या खूप मोठ्या संधीस आपण मुकत आहोत.

वैयक्तिक कारणामुळे जुलै २०२० मध्ये मला नोकरी सोडण्याची वेळ आली आणि आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला, याच काळामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात चालू होता ( जो कि सध्या देखील सुरु आहे) नोकरी नाही, उद्योग धंदा नाही, नजरेपुढे अगदी गडद अंधार होता पण म्हणतात ना गरज हो शोधाची जननी आहे आणि गरज निर्माण झाली कि माणूस कोणताही शोध लावू शकतो. खाजगी नोकरी करत असल्यामुळे युट्युब आणि वेबसाईट(ब्लॉग) हे अडगळीत पडलेले होते, त्यालाच मी उत्पन्नाचे साधन बनविण्याचे ठरविले आणि असेही हाताला काही काम नसल्यामुळे संपूर्ण वेळ मी युट्युब चॅनलवर काम करण्याचे ठरविले. मी सातत्याने युट्युबवर सतत काम करत होतो माझ्या युट्युब चॅनलवरील व्हिडीओज मुळे अनेकांना फायदा होत आहे आणि यामुळे लोकांना माझ्या युट्युब चॅनलवरील व्हिडीओ आवडायला लागले. इंटरनेटवर कधीही काहीही होऊ शकते. या विचाराशी मी पूर्णपणे सहमत आहे. मी शेतकऱ्यांच्या विविध योजनासंबधी माहिती देण्यास सुरुवात केली आणि माझे सबस्क्रायबर व पैसा दोन्ही वाढायला लागले आहेत. आज नोकरी नसतांना आणि पैशांची अत्यंत गरज असतांना २० ते २५ हजार प्रती महिना कमावत आहे आणि हि नक्कीच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि बोनसमध्ये समाधान मिळते ते वेगळेच.

तरुण मित्रांना मला एवढेच सांगायचे आहे कि नोकरी नसेल तर निराश होऊ नका. समाजमाध्यमांमध्ये तुम्ही तुमचे करिअर घडवू शकतात,तुमच्यामध्ये काही कौशल्य असेल तर ते लोकांसमोर मांडून तर बघा यश नक्की मिळेलच. मी खेडेगावातील आहे, ते माझे कामच नाही, माझ्याकडून होईल का? हा न्यूनगंड मनातून आधी काढून टाका, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि अपयशाची भीती न बाळगता तुमच्या कामात सातत्य ठेवा  समोर मग बघा विजय तुमचाच आहे. सुरुवातीला तुम्ही अडखळाल, लोकं तुम्हाला हसतील, मात्र तुम्ही ठाम राहा, अगदी त्या विशाल पर्वतासारखे जो उन वारा पाउस यांची कसलीही चिंता न करता अगदी कणखर पणे उभा असतो. तुम्ही देखील तसेच व्हा अगदी ठाम विशाल पर्वतासारखे अगदी विशाल!


Tuesday 29 September 2020

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

 

 मित्रांनो नमस्कार, शेतकरी म्हटला कि अनंत अडचणीचा डोंगर असे चित्र आपल्याडोळ्यासमोर उभे राहते. मोठ्या कष्टाने हाती आलेले पिक जागविण्यासाठी लोडशेडिंग मुळे झोपेला फाटा देऊन अंधारामध्ये रात्रीच्या दोन दोन वाजता शेताला पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. तर हि कुचंबना थांबविण्यासाठी आता तुम्ही तुमच्या शेतातील विहिरीवर सौर उर्जेवर आधारित सौर पंप लावू शकता आणि दिवसा शेताला पाणी देऊन रात्री अगदी निवांत आराम करू शकता ना लाईटचे टेन्शन ना लोडशेडिंगची चिंता. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करू शकता.. या संदर्भातील बातमी दैनिक लोकमत वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेसाठी  कसा करतात हे मी आजच्या व्हिडीओमध्ये पत्यक्ष उदाहरणासहित सांगणार आहे..

मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याअगोदर हि योजना कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे..यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात..या योजनेच्या लेटेस्ट GR मध्ये काय लिहिले आहे हि माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसंदर्भात माहितीची pdf फाईल व याच योजनेचा लेटेस्ट GR www.digitaldg.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तुम्ही हि माहिती तुमच्या मोबाईलमध्ये एका क्लिकवर डाउनलोड करू शकता..त्यासाठी गुगलमध्ये टाईप करा. digitaldg.in त्यानंतर हि वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवरील इंग्लिश आर्टिकल या बटनावर क्लिक करा...त्यानंतर  Maharashtra solar pump yojna online application या लिंकवर क्लिक करा..त्यानंतर पेजला थोडे खाली स्क्रोल करा. या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना pdf अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा..या लिंकवर क्लिक करताच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेविषयी माहिती असलेली pdf फाईल तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड होईल...हि सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या.

त्यानंतर याच ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लेटेस्ट GR उपलब्ध आहे तो तेखील तुम्ही एका क्लिक मध्ये तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना pdf अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा..या लिंकवर क्लिक करताच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेविषयी असलेला gr तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल तो देखील तुम्ही सविस्तर वाचू शकता...

चला तर मित्रांनो आता थोडाही वेळ न दवडता जाणून घेवूयात कि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन’ अर्ज कसा करतात.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात करण्याअगोदर तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा..आधार कार्ड अर्जदार sc किंवा st जातीचे प्रमाणपत्र ह्या सर्व कागदपत्रांची स्कॅन केलेल्या फाईल्स तुमच्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे कारण अर्ज भरतांना या सर्व फाईल्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड कराव्या लागतील.

त्याच प्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही हा सौर पंप इंस्टाल करणार आहात म्हणजेच बसविणार आहात त्या जागेच्या जवळ एखादी विहीर असेल तर जवळचा महावितरण ग्राहक क्रमांक हा फॉर्म भरताना तुम्हाला आवश्यक आहे त्यासाठी अगोदरच शेजारच्या विहिरीसाठी किंवा बोरसाठी विद्युत कनेक्शन घेतले असेल तर त्यांचा ग्राहक क्रमांक नोंद करून घ्या..

Friday 7 August 2020

कोळेगाव येथील बैल पाडवा व यात्रा कार्यक्रम रद्द

 

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे दरवर्षी श्री भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सव पोळा पाडवा सण उत्साहात साजरा करण्यात येतो. सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्री भैरवनाथ महाराज जागृत संस्थान व ग्रामपंचायत कार्यालय कोळेगाव यांच्या वतीने यावर्षी दि.19/08/2020 रोजी आयोजित होणारा कुस्त्या व यात्रा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोळेगाव येथील नागरिकांनी चालू स्थितीवर विचार मंथन करून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी भक्तांनी यावर्षी दर्शनासाठी येवू नये तसेच भैरवनाथ महाराज संस्थान परिसरामध्ये कोणीही प्रसादाचे, फराळाचे किंवा इतर दुकाने लावू नये असे आवाहन ग्रामपंचायत कार्यालय व श्री भैरवनाथ महाराज जागृत संस्थान कोळेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Sunday 26 April 2020

कोळेगाव येथे आरोग्य अधिकारी कर्मचारी आशा वर्कर पुष्पगुच्छ उधळून स्वागत


जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी,कर्मचारी व आशा वर्कर यांचे कोळगाव येथील गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व डॉक्टर,कर्मचारी हे जागरूकतेने काम करीत आहेत सोबतच या कोरोनाच्या लढाईत ते गावात जनजागृती करत आहेत त्यामुळे कोरोनाचे भय निघून गेले असून त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे म्हणून गावकरी तशी काळजी घेत आहेत. सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून गावातील व्यवहार सुरळीत चालू  आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर व कर्मचारी वर्गाने वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने गावकाऱ्यांना धीर मिळाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी निर्णय घेतला की रात्रंदिवस मेहेनत घेणाऱ्या या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करावे. गावकरी देखील तुमच्या कार्यात तेव्हडीच साथ देणार हा आत्मविश्वास निर्माण व्हावा ही त्यामागची भूमिका. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येत सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळत प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राऊत,डॉ शिंदे,डॉ फदाट, ANM खेसर मॅडम,आशा वर्कर मनीषा सुरडकर अंगणवाडी सेविका या सर्वांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. यावेळी जिल्हापरिषद केशव पाटील जंजाळ पंचायत समिती सदस्य सुदाम पाटील देठे, सरपंच गजानन पाटील गावंडे, माजी सरपंच पंडित पाटील, भैरवनाथ संस्थान अध्यक्ष सांडू साहेब गावंडे माजी सरपंच पुंडलिक पाटील गावंडे, माजी सरपंच तेजराव पाटील गावंडे, डॉ ईश्वर वाघ ग्रामपंचायत सदस्य नंदू पाटील सुसर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी गावकरी या कौतुक सोहळ्यात सामील झाले होते.
कोरोनाच्या या लढाईत 24 तास काम कारणाऱ्या डॉक्टर्स व अधिकारी कर्मचाऱ्यांना गावकरी साथ देतात व त्यांच्या सेवेचे कौतुक करतात हा पायंडा या गावाने पाडून दिला असून कोरोनाशी लढ्यासाठी आम्ही सर्व सोबत आहोत हे दाखवून दिले आहे.

Saturday 7 March 2020

मुलींच्या कमतरतेमुळे 'बायको मिळेना लग्न जुळेना' परिस्थिती.


मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन ह्या वृत्तीला आज आपल्याला कायमची मूठमाती देण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील काही वर्षापूर्वी केलेल्या अमाप स्त्री अर्भक गर्भपातामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्री पुरुष प्रजनन संबधी असंतुलन निर्माण झाले आहे. मुले जास्त आणि मुलींची संख्या कमी असल्यामुळे अनेक तरुणांना लग्नासाठी ‘बायको मिळेना लग्न जुळेना’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याचे परिणाम आजच्या तरुणांना भोगावे लागत आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे अमाप क्षमता, कौशल्य व ज्ञान स्त्रियांजवळ असते यात तिळमात्र शंका नाही तरी देखील स्त्रियांना पूर्णपणे न्याय मिळाला आहे का? या प्रश्नांचे उत्तर नक्कीच हो असे आज तरी देता येणार नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये शिकण्यासाठी जितक्या संधी मुलांना मिळतात तितक्याच संधी जर मुलींना मिळाल्या तर नक्कीच त्या त्यांचे अस्तित्व अधोरेखित करू शकतील ग्रामीण भागामध्ये काही अपवाद वगळला तर अजूनही मुलींना दहावी किंवा बारावीच्या पुढे शिक्षण घेण्याची संधी मिळत नाही. बारावीचे शिक्षण झाले म्हणजे वडिलांना तिचे हात पिवळे करण्याची घाई असते किंबहुना मुलगी हि एक जबाबदारी आहे लग्न झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे मुलींच्या पालकांना वाटते असे म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही. केवळ महिला दिनाच्या एका दिवसासाठी नव्हे तर कायमचा मुलींना व महिलांना सम्मान आणि समानसंधी देण्याची गरज निर्माण झाली आहे.