Tuesday 20 December 2016

कोळेगाव येथे फोटो स्टुडीओचे उद्घाटन.


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे ‘यशवंत डिजिटल फोटो स्टुडीओचे उद्घाटन दिनांक १९ डिसेंबर रोजी करण्यात आले. दिवसेंदिवस रोजच्या व्यवहारामध्ये इंटरनेटचा उपयोग वाढत असल्यामुळे प्रत्येक व्यवहारासाठी इंटरनेट जवळपास आवश्यकच झाले आहे. ऑनलाईन कामे, झेरॉक्स, पासपोर्ट साईझ फोटो आदी छोट्या छोट्या कामांसाठी नागरिकांना बाहेरगावी जाऊन कामे करावी लागतात. नागरिकांची ही गरज ओळखून गावातच नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने प्रेरित होऊन येथील तरुण दादाराव गावंडे यांनी ‘यशवंत डिजिटल फोटो स्टुडीओचची सुरुवात केली आहे. सदरील स्टुडीओचे उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिक व मा.सरपंच रामराव पा. गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मा. सरपंच पुंडलिकराव गावंडे, सरपंच गजानन गावंडे, उपसरपंच दादाराव गावंडे. सांडू साहेब मा. सरपंच पंडितराव गावंडे, डॉ. ईश्वर वाघ, नंदकिशोर सुसर, रामचंद्र गावंडे, रमेश गावंडे, गणेश सोनवणे, अवचित सोनवणे आदींची उपस्थिती होती.

Friday 9 December 2016

कार्यशाळेचे आयोजन.

दिनांक ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत फुलंब्रीकर नाट्यगृहात पशुसंवर्धन विभागातर्फे कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन इत्यादी व्यवसायाविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहेत. ग्रामीण भागामध्ये उद्योग शेती निगडीत उद्योग व्यवसाय करू इच्छीनाऱ्या तरुणांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. (सदरील माहिती दैनिक देशोन्नती वर्तमान पत्रातील दिनांक १० डिसेंबर २०१६ रोजी प्रकाशित झालेल्या बातमीच्या आधारे दिलेली आहे.)

Wednesday 7 December 2016

कॉम्पुटर हार्डवेअर प्रशिक्षणाचे आयोजन.


आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये संगणक हा माणसाच्या जीवनामधला अत्यंत आवश्यक घटक बनला आहे.त्यामुळे या क्षेत्रामध्ये प्रचंड रोजगाराच्यासंधी निर्माण होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगारांसाठी मोफत कॉम्पुटर हार्डवेअर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा.

(सूचना-सदरील माहिती ही दिनांक ८ डिसेंबर २०१६ रोजी प्रसिद्द झालेल्या दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे देलेली आहे.)

Sunday 20 November 2016

औरंगाबाद येथे नोकर भरती मेळावा

देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे दिनांक १ डिसेंबर २०१६ रोजी जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण विभागातर्फे व्यवसाय शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांसाठी भारती मेळावा आयोजित केला आहे. सदरील मेळावा हा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय औरंगाबाद, देवगिरी महाविद्यालय, बोर्ड ऑफ अॅप्रेंटीस ट्रेनिंग मुंबई,सीएमआय औरंगाबाद,मसीआ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यानी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.(सदरील माहिती ही दैनिक सांजवार्ता दिनांक २० नोव्हेंबर २०१६ रोजीच्या वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे देलेली आहे.)

Monday 14 November 2016

शेत मालाला योग्य भाव हवा.


सततचा पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे शेतकरी कायम चिंताग्रस्त असतो पण चालू वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकरी वर्गात कमालीचा आनंद व्यक्त होत आहे. निसर्गाने या वर्षी साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांचा मालाचे उत्पादन वाढणार आहे. कपाशी, मक्का, सोयाबीन, तूर आदी पिके मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने जोपासले आहे. शासनाने शेतकऱ्याच्या मालास योग्य भाव दिल्यास तेंव्हाच खऱ्या अर्थाने मेहनतीचे चीज होईल असे म्हणता येईल. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा काणा आहे, कोणताही राजकीय पक्ष असो त्या पक्षाचे नेते निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव वाढवून देऊ अशी आश्वासने देऊन निवडून येतात आणि सत्ता आली की त्यांना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडतो. शेतकऱ्यांची केवळ अनुदानावर बोळवण न करता शेतीसाठी ठोस उपाय योजना  करून शेतकऱ्यांसाठी विविध योजना अंमलात आणाव्यात त्याचप्रमाणे शासकीय स्तरावर शेतीविषयक विविध चर्चासत्रे, प्रात्याक्षिके, कार्यशाळा असे कार्यक्रम आयोजित करून राबविल्यास सदैव आर्थिक विवंचनेत गुंतत चाललेला शेतकरी खऱ्या अर्थाने उभारी घेऊ शकेल यात शंका नाही. 
( या लेखामध्ये संदर्भासाठी दिनांक १४ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रकाशित झालेल्या दैनिक सकाळ वृत्तपत्रातील औरंगाबाद टुडे या पुरवणीतील कात्रणाचा उपयोग केला आहे) 

Monday 17 October 2016

सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सुवर्ण संधी.

जिल्हाउद्योग केंद्र जालना यांच्या मार्फत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीसाठी जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नवीन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी सुधारित बीजभांडवल योजनेतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. गरजू आणि होतकरू तरुणांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबधित व्यक्तीकडे बातमी वाचून सखोल चौकशी करावी.

Saturday 8 October 2016

शंकेखोर प्रवृत्तीचे सर्जिकल व्हावे..!

भारतीय लष्कराने केलेली सर्जिकल स्ट्राईक्सची कृती अपरिहार्य आणि अनिवार्य होती पाकिस्तानच्या मुजोरीचा तो एकप्रकारे मुहतोड जवाब होता. याबाबत सध्या भारतामध्ये राजकीय वादळ निर्माण होत आहे, अशा मुद्द्यावर बोलताना राजकीय नेत्यांनी थोडे तारतम्य बाळगायला हवे. राजकीय कंडू शमविण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक बाबत पुरावे मागून लष्करालाच खोटे ठरविणे ही मनोवृत्ती भारतीय लष्कराच्या निष्ठा व विश्वासहर्तेला सुरुंग लावणारी आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय संबध, देशांतर्गत परिस्थिती, शेजारी देशाशी असलेले संबध व देशाची संरक्षक विषयक भूमिका या सर्वांच्या विचार करता सगळ्याच गोष्टी जगजाहीर करता येत नसतात. आणि हे आम्हीच केले असे म्हणून उगाच कोणी डांगोराही पिटून सर्जिकल स्ट्राईक बाबत श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये राजकारणी लोकांना राजकारण करायला फक्त मुद्दा हवा असतो, मग ते नेते सत्ताधारी पक्षातले असोत की विरोधक. भारताची एकता अबाधित राखण्यासाठी अशा राष्ट्रीय मुद्द्याविषयी एकमेकांवर चिखलफेक केल्यापेक्षा सर्वांनी ह्या मुद्द्यावर न बोलणेच योग्य ठरेल..! बाकी राहिला मुद्दा जनतेच्या हिताचा, तर त्यासाठी शेतकरी आत्महत्या, दारिद्र्य निर्मुलन, पाणी टंचाई, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी ह्या मुद्द्यावर देखील बोला ना, पण मात्र अशा राष्ट्रीय मुद्द्यावर बोलून ‘आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’ असे वागणे म्हणजे खरी गरज आहे ती तुमच्या असल्या शंकेखोर विचार करण्याच्या प्रवृतीचे सर्जिकल करण्याचे..!.

Wednesday 28 September 2016

कोळेगाव जि. प. शाळेस जाळ्या भेट.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे कै. लीलाबाई व्यायाम शाळेतर्फे कोळेगाव जिल्हा परिषद शाळेस वृक्ष संरक्षण जाळ्या भेट देण्यात आल्या. झाडे लावा झाडे जगवा’ हे घोष वाक्य खऱ्या अर्थाने कृतीत उतरविले आहे ते कोळेगाव येथील नवतरुण माजी सरपंच पंडितराव गावंडे यांनी. कोळेगाव येथील शाळेत विदयार्थी संख्या वाढावी व विद्यार्थ्यांचे शिक्षणातील स्वारस्य वाढावे यासाठी शाळेत आकर्षक रंगरंगोटी केलेली आहे. त्याच प्रमाणे शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. सदरील लावलेल्या झाडांना संरक्षण जाळ्या असल्यास झाडांना नुकसान होणार नाही या कल्पनेतून आणि ज्या शाळेत आपली पाल्य शिकताहेत त्या शाळेसाठी आपलेही काही देणे लागते या भावनेतून पंडितराव गावंडे यांनी स्वखर्चातून लोखंडी जाळ्या शाळेस भेट दिल्या आहेत. केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता प्रत्येकांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शक्य होईल तेवढी मदत करावी असे आवाहन यावेळी माजी सरपंच पंडितराव गावंडे यांनी केले आहे. यावेळी शिक्षक नागने सर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनील गावंडे, अंकुश गावंडे, शांताराम गावंडे, सांडू गावंडे, भाऊसाहेब गावंडे आदींची उपस्थिती होती.

Tuesday 13 September 2016

सत्याचा आवाज दाबला जाऊ नये.

मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच लाखाची लाच मागितल्या प्रकारी ‘विनोदवीर’ कपिल शर्माने उगाच वाद ओढवून घेतला. पण या प्रकरणाची दुसरी बाजूही लक्षात घेणे आवश्यक आहे, की पंधरा कोटी रुपये कर भरून देखील कोणी लाच मागत असेल तर आपल्या समाजाला कीड नव्हे भयंकर रोग झाला आहे. निर्भीडपणे नरेंद्र मोदींनाच ट्विट काल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दखल घेणे अपेक्षितच होते पण कोणताही पुरावा नसताना एखाद्यावर आरोप करणे ही नक्कीच अपमानास्पद बाब आहे. आपला समाज हा कलाकारांचे अनुकरण फार करतो कपिल शर्मा हा प्रसिद्ध कलाकार असल्यामुळे त्यानेही आपण काय बोलतो कसे वागतो याचा थोडा विचार करायला हवा आणि समजा  खरेच कोणी लाच मागितली असेल आणि संबधित अधिकाऱ्याचे नाव केवळ राजकीय दबावामुळे तो सांगत नसेल तर ही एकप्रकारची दडपशाही ही असू शकते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे कपिलच्या या वक्त्यव्याने राजकारण्यांना आयतेच कोलीत मिळाले आहे. एखाद्या कामासाठी शासकीय कर्मचाऱ्याकडून लाच मागणे हा जसा गुन्हा आहे तसाच बेकायदा बांधकाम करणे, तिवरांची झाडे तोडणे हा देखील गुन्हाच आहे पण मुंबई नगर पालिकेने आत्ताच कापील शर्मा विरुद्ध गुन्हा दाखल करणे हे संभ्रम मिर्माण करीत आहे. आपल्यावर जर खरोखरच अन्याय होत असेल तर आवाज उठवायलाच हवा..किंवा जर कोणी त्याविरुद्ध आवाज उठवीत असेल तर त्याला पाठींबा तरी द्यायला हवा फक्त तो आवाज निष्पक्ष हवा..! 

Sunday 4 September 2016

मिरचीचा 'हिरवा चिखल' न होवो.!


मागील दोन वर्षापासून मिरची ह्या पिकावर रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव  असल्यामुळे परिणामी मिरचीने भावाचा नवीन उच्चांक गाठला. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे ह्या वर्षी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. आणि जे अपेक्षित होते तेच झाले. चौदा रुपये प्रति किलो विकली गेलेली मिरची आज पाच रुपये प्रती किलो या भावाने विकली जात आहे. व्यापारी वर्गाकडून एक प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. जिवाची तम न बाळगता शेतकरी रात्रंदिन अपार कष्ट करतो तेंव्हा कुठे पीक त्याच्या हाती लागते. पण एवढे करूनही शेतकरी मार खातो ते मार्केटिंगमध्ये, सर्वच बाबतीत सरकार शेतकऱ्यांची मदत करू शकणार नाही. त्यामुळे 'ट्रेंड' बघून शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांचे नियोजन केल्यास आज मिरचीची जी परिस्थिती आहे त्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. अर्थ शास्त्राच्या मांगणी आणि पुरवठा हा सिद्धांतही लक्षात घेणे आवश्यक आहे. एखाद्या पिकाला जर चांगला बाजार भाव मिळत असेल तर सर्वांनीच  त्याकडे वळणे योग्य ठरणार नाही कारण उत्पादन जास्त झाले कि बाजार भाव आपोआपच कमी होतात. केवळ एकाच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके शेतकऱ्यांनी घेतल्यास जेणे करूनएखाद्या शेत मालास भाव कमी मिळाल्यास दुसऱ्या पिकातून त्याची भरपाई करता येइल. याचप्रमाणे शेतमालाच्या मार्केटिंगचा अभ्यास करून पिकांचे नियोजन केल्यास याचाही शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. सध्यातरी मिरचीने शेतकऱ्यांना ठसका लावला आहे, त्याचा 'हिरवा चिखल' न होवो एवढीच अपेक्षा...!

Wednesday 31 August 2016

कोळेगाव येथे पोळा उत्साहात साजरा


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे पोळा सण शांततेत साजरा करण्यात आला. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी बळीराजाच्या सणासाठी कुठलीही कमी भासू दिली नाही. दुपारी अंदाजे पाच वाजे दरम्यान गावाच्या वेशीजवळ वाड्या वस्त्यावरील सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना सजवून शांततेत उभे केले. दरम्यान पोळा फुटताच वरून राजाने जोरदार हजेरी लावल्यामुळे गाववासीयांच्या आनंदला पारावर उरला नाही. गावातील युवकांनी पोळ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करून पारंपारिक पद्धतीने गावातून बैलांची मिरवणूक काढली. पोळ्याच्या दुसऱ्या दिवसी श्री भैरवनाथ महाराज मंदिराच्या परिसरामध्ये पाडव्यानिम्मित पंचक्रोशीतील शेतकरी आपापल्या बैलांसहित मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात, याही कार्यक्रमासाठी गावकऱ्यांच्या वतीने व्यवस्था केल्यामुळे पाडव्याच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Saturday 27 August 2016

Turn toward business.


Day by day the numbers of unemployed youth are increasing. Everyone wants to get five figure job and hence the competition of education is getting so stressful. If job dosen’t get then youth should have to turn to business. Lot of opportunities are waiting for you. Many student who belongs from rural villages goes to city, joined private classes, working hard even they failed to get job and in this situation they commit suicide. Students or youth have to understand that only get a job is not a main aim of education. If you fail to get job no problems try to do different. Today lot of business opportunities available if you start small scale business then some youth also have get job from you, dairy milk, goat farming, chickens farming, milk processing business may option have there. These business ideas not only make you survey in village but also may make you millionaire if you are dedicated to your work, you have done for something for your native place this valuable satisfaction will make you more courage. 

Tuesday 23 August 2016

आता लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक २०२०

रिओ ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय ११७ खेळाडूच्या चमूने फक्त दोन पदके प्राप्त केलीत ही गोष्ट नक्कीच विचार करण्याजोगी आहे. याला करणाच आपली व्यवस्था आहे. लहानपणापासूनच जर मुलांना शालेय शिक्षणाबरोबरीने खेळण्यास वाव दिला तर आपसूकच आत्ताचे हे चित्र वेगळे दिसेल यात शंका नाही. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणापासूनच त्याची तयारी करून घ्यायला हवी, त्यासाठी प्रत्येक शाळेत विविध खेळांचे अद्यावत प्रशिक्षण व प्रशिक्षक असणे अत्यंत आवश्यक आहे. आज प्रत्येक जन शाळेत जातो तो डॉक्टर, इंजिनीअर, वकील होण्यासाठी, खेळांकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टीकोनच नकारत्मक आहे. हा दृष्टिकोन बदलायला हवा विशेषतः ग्रामीण भागातील शाळेत तर अनेक विध्यार्थी असे असतात कि त्यांच्यामध्ये अचाट क्रीडा कौशल्य असतात आणि त्यांच्या ह्या गुणाला शिक्षक हेरतात पण अपुऱ्या क्रीडा सोईसुविधामुळे विध्यार्थ्यांचे हे कलागुण तिथेच लोप पावतात. त्यामुळे शासकीय पातळीवरून शहरासाहित ग्रामीण भागातही क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्यास टोकियो २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यापेक्षा निराळे चित्र बघण्यास मिळेल अशी अशा करूयात...!

Tuesday 9 August 2016

खेड्यांचा सर्वांगीण विकास व्हावा..

शहराचा आणि गावाचा समतोल राखण्यासाठी खेड्यांचा विकास होणे अत्यन्त आवश्यक आहे. शासनाने रोजगाराभिमुख योजना राबवून खेडेगावातील तरुणांना प्रशिक्षित केले तर रोजगारासाठी शहरात होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल. दिवसेंदिवस कामानिमित्त ग्रामीण भागातील तरुण वर्ग शहराकडे वळतो आहे. वास्तविक पाहता कोणत्याही व्यक्तीला आपला गाव किंवा राष्ट्र आपणहून सोडावे लागत नाही केवळ परिस्थितीमुळे त्यांना हे करावे लागते. त्यामुळे गावातच रोजगाराची व्यवस्था उपलब्ध झाल्यास गाव तर प्रगत होईलच पण दिवसेंदिवस शहरात वाढत चाललेल्या गर्दीला आळा घालणे शक्य होईल. महात्मा गांधीने फार पूर्वीच म्हटले होते कि खेड्याकडे चला, पण आता पर्यंत तरी म्हणावा हा विषय सरकार ने गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. आता अगदी खरोखरच गरज अशे ती खेड्याकडे वळण्याची. गावपातळीवर विविध शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असतात. पण केवळ माहिती नसल्याने ग्रामीण भागातील तरुण शेतकरी वर्ग यापासून वंचित राहतो आणि माहिती असलीही तरी साहेबांचा खिसा गरम केल्याशिवाय काम होण्याची तसु भरही शक्यता नसते हि परिस्थिती बदलायला हवी. बेरोजगरीमुळे एकीकडे खेडी ओस पडताहेत तर शहरे अवाढव्य विस्तारत आहेत, त्यामुळे भविष्यात निर्माण होणारा हा धोका लक्षात घेऊन वेळीच उपाय योजना करायला हवी. ग्रामीण भागातील तरुणांना गावातच प्रशिक्षण देऊन शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण त्यासाठी लागणारे भाग भांडवलाची व्यवस्था केल्यास, गावमध्येच रोजगार निर्माण होईल परिणामी इतर तरूणांना हि त्यासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. तरुणांनी देखील केवळ नोकरीसाठी शिकता व्यवसायाभिमुख शिक्षणाची कास धरल्यास झपाट्याने फुगणारी शहरे आणि एकीकडे ओस पडणारी खेडी यांचा सुवर्णमध्य निघू शकेल अशी आशा करूयात.

Tuesday 19 July 2016

समाज मनपरिवर्तनाची आवशक्यता.


कोपर्डी अत्याचाराचा कराल तेवढा निषेध कमीच आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणामुळे कायद्यामध्ये बदल करून देखील अशा घटना घडत असेल तर ही अगदी लाजिरवाणी बाब आहे. कितीही कायदा केला, आंदोलने केली तरी अशा घटना थांबणे शक्य नाही हेच कोपर्डी येथील घटनेतून अधोरेखित झाले आहे. असली घटना परत घडू नये यासाठी कडक कायदा तयार करून तो काटेकोर पणे अमलात आणण्याची आवश्यकता आहे. तरुण वर्गावर चित्रपटांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असल्यामुळे अशा घटना घडण्यामागे बऱ्याच अंशी चित्रपट जबाबदार असू शकतात. बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यात जात धर्म किंवा पंथ हा निकष असता कामा नये. राज्याची सुरक्षितता ही सरकारची मुलभूत जबाबदारी आहे त्यामुळे आरोपींना कडक शिक्षा व्हावी हीच जनतेची अपेक्षा असेल हे नक्की..

Wednesday 13 July 2016

मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका.


नुकत्याच बाळापुर येथील घडलेल्या घटनेमुळे मन अगदी सुन्न झाले. केवळ उजळणीचा एक पाढा बिनचूक न म्हणता आल्यामुळे एका ६ वर्षाच्या निरागस चिमकुलीस आपला जीव गमवावा लागला. आपल्या समाजाची मानसिकताच पार ढेपाळलली आहे. जितका समाज सुशिक्षित होत चालला आहे किंबहुना त्याहीपेक्षा क्रूरतेचा कळस गाठत आहे असे म्हणण्यास हरकत नाही, आणि याला कारणीभूत आहे ती आजची स्पर्धात्मक जीवघेणी शिक्षण पद्धती. मुलांपेक्षा पालकांच्याच अपेक्षा पूर्ण करण्याचाच जास्त ताण मुलांवर असतो, शेजारील अमुक एक विद्यार्थ्याने बघ तुज्यापेक्षा जास्त गुण मिळवले, तुझ्या मित्राने अमुक एका स्पर्धेत बक्षीस मिळवले, आणि तू मात्र ढिम्मच अशा आशयाची सतत टोमणी मुलांना दिल्यामुळे ते सतत नैराश्येमध्ये वावरत असतात आणि मग आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतात. याला सर्वस्वी आपण जबाबदार आहोत. मुलांना हे कर ते कर अशा उपदेश देण्याआगोदर याच वयात असतांना आपण किती आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो याचे विश्लेषण करावे. पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न लाधता आजच्या त्यांची मानसिकता आणि कल ओळखून त्यांना हवे त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यास संधी द्यावी.


अनामिक ओढ...

“गण्या लेका गुरं हाक की”, तशी गण्याची तंद्री भंग पावली आणि त्याने गुरे घराकडे हाकलली. सूर्य मावळला होताप्रकाश अंधुक झाला होतापणती तेवत होती आणि अचानक पतंगाने दिव्यावर झडप घातली..!
नाव “गणेश बापूराव पीपळेकर”.
सध्या काय करताय “शेती”.
अनुभव “बऱ्यापैकी”
      गणेश पीपळेकरने मुलाखत आटोपली आणि लगबगीने घरी जाण्यासाठी गाडी पकडली. गाडीच्या चाकापेक्षा डोक्यात चालू असलेल्या विचारांची गती अधिक जाणवत होती, जुलै संपला तरी वरून राजा काही हजेरी लावेना, उगवणारा प्रत्येक दिवस सोबत चिंता घेवून येत असे आणि मावळतांना ढवळून निघालेल्या गढूळ पाण्यातील गाळ खाली बसावा त्याप्रमाणे शांत होत असे; चिंतेची उत्तरे मात्र नेहमी पोरकीच असत. समोर दुष्काळ उभा ठाकला असतांना आयुष्याच्या उस्कटलेल्या गोधडीला नोकरीचे ठिगळ लावण्याच्या प्रयत्नात कागदावरील ‘गणेश’चा शेतातील गण्या पार वैतागून गेला होता. वाणिज्य शाखेची पदवी मिळाल्यानंतर गाण्याच्या शिक्षणाची वाढ खुंटली ती कायमचीच. शहरामध्ये काही दिवस खाजगी संस्थेत नोकरी केल्यानंतर म्हाताऱ्या आईवडिलांच्या देखभालीसाठी तो नोकरी सोडून गावाकडे आला तो कायमचाच. शेती होती पण सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे त्याच्या मनातील हिरवळ केंव्हाच करपली होती.सोज्वळ चेहरा, मितभाषी व्यक्तिमत्व, साधी राहणी, आणि नेहमी आशावादी असणाऱ्या गाण्याला गावामध्ये फारच कमी मित्र होते.
       निवडणुकीचा काळ जवळ येत होता तसे तालुक्यामध्ये सोशल मिडियाचे वारे जोरात वाहू लागले होते. तालुक्यातील एका प्रतिष्ठित नेत्याने निवडणूक जिंकण्यासाठी सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करण्याचे ठरविले, तीन महिन्यासाठी तसा करारही पुण्यातील सोशल मीडियातील एका नामवंत कंपनी सोबत केला होता. पुण्याच्या कंपनीनेही साहेबांचा हायटेक प्रचार करण्यासाठी कंबर कसली. स्थानिक हुशार आणि होतकरू तरुणांना या कामासाठी समाविष्ट करून घ्यावे या नेतेसाहेबांच्या विनंतीवरून कंपनीनी त्यासाठी वर्तमान पत्रामध्ये जाहिरात दिली होती आणि त्याचीच मुलाखत देऊन गण्या घरी आला होता.
      गाण्याच्या हुशारीला हेरून कंपनीने गाण्याला कामावर रुजू करून घेतले, तीन महिने का होईना पण पुण्यातील हुशार मंडळी बरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे गण्या खूप खुश होता.
“गणेशराव तुमच्याकडे जरी कॉम्पुटरची पदवी नसली तरी एक बेसिक नॉलेज आहे, आणि तुम्हाला मराठी चांगली येत असल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही दिलेली कामे तुम्ही वेळेत पूर्ण कराल. आमचा एक कर्मचारी तुमच्या सोबत असेल आणि दिवस भराच्या कामाचा तुम्हाला आम्हाला पुणे येथे रिपोर्ट करावा लागेल. कंपनीचे व्यवस्थापक गाण्याबरोबरच सगळ्यांना काम समजावून देत होते. आमची पूर्ण टीम तुम्हाला पुण्याहून ऑनलाइन मार्गदर्शन करेल अर्थातच आपण प्रत्यक्षपणे सोबत नसलो तरी अप्रत्यक्षपणे सोबत असू. तालुक्याच्या ठिकाणी एक कर्मचारी ठेवून कंपनीची टीम पुण्याला निघून गेली.
      इंटरनेट ने जोडलेले सुसज्ज संगणक, गाण्यासारखेच मुलाखतीद्वारे निवडलेले सहा तरुण, एक टेलीफोन, कळपातून एकटं मागे राहिलेलल्या हरिणीच्या पिल्लाप्रमाणे भेदरलेलं पुण्याच्या कंपनीचा एक कर्मचारी आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेते साहेबांचे दोन विश्वासू निकटवर्तीय व्यक्ती इतक्या भांडवलावर ऑफिस सुरु झालं.
कामाचा पहिला दिवस होता, सर्वजण उत्साहात काम करीत होते. मेंढराच्या कळपात वाघाचं पिल्लू आसवं त्याप्रमाणे ‘श्रेयस’ दिसत होता. त्याला ना इथले राहणीमान आवडत होते ना वातावरण, फक्त एक प्रकल्प पूर्ण करायचा असल्यामुळे तो अगदी मेटाकुटीला येउन बोटावर दिवस मोजत होता.
“ बघा गणेशराव तुम्ही सोशल साईटवर साहेबांचे छायाचित्रे अपलोड करायचे, काकफळे तुम्ही अनिसने आणलेल्या साहेबांच्या छायाचित्रांची डिझाईन बनवून मला शेअर करायची, नरवडे तूम्ही साहेबांच्या एखाद्या इव्हेन्टचा मजकूर फास्ट टाईप करून मला शेअर करायचा. पुण्याहून केंव्हाही एखादी सूचना येऊ शकते त्यामुळे प्रत्येकाने आपापले स्काईप अकाउंट मध्ये सदैव ऑनलाइन राहा” श्रेयसने सगळ्यांना त्यांच्या कामाची विभागणी करून दिली.
      गाण्याला हे सर्व खूप मजेशीर वाटत होतं. पुण्याची लोकं त्यांची बोलण्याची पध्दत, स्काईप, फेसबुक, व्हाट्सअप, सोशल मिडिया. दिवस सशाच्या गतीने सुरु झाले.
“गणेशराव तुम्ही मला न रिपोर्ट करता आमच्या पुण्याच्या सोनल जोशींना स्काईपद्वारे रेपोर्ट करा. मला दुसरी कामे दिली आहेत कंपनीने” श्रेयस
      रणरणत्या उन्हामध्ये अनवाणी चालतानां अचानक थंड वाऱ्याचा झोताने मनाला वोलंचिंब करून टाकावे तशी गण्याची अवस्था झाली.
“काकफळे तुम्ही कुलकर्णी सरांना रेपोर्ट करा, अनिस तू सातपुते सरांना” श्रेयसने आम्हाला सगळ्यांना पुण्यातील कंपनीच्या लोकांसोबत ऑनलाइन जोडून दिले.
 जसजशी निवडणूक जवळ येत होती तसतशी कामाचा जोर वाढत होता. गाण्याला आता पुण्यातील सोनाल जोशींना रिपोर्ट करावा लागत होता. स्काईप, फेसबुक, व्हाट्सअप च्या सोशलच्या अभासी वातावरणामध्ये सगळेच मग्न झाले होते.
गणेश पीपळेकर, अत्यंत लाघवी स्वभावाचा, हुशार आणि मितभाषी तरुण, याअगोदर शहरामध्ये नोकरी करीत असतांना कामातील हुशारी, वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा या गुणांमुळे त्याने सर्व ठिकाणी आपली छाप पडली होती, शहरामध्ये असतांना प्रचंड वाचन केले व वाचनामुळे लिखाणाची आवड निर्माण झाली. रुळलेल्या वाटेवर चालतांना फार कष्ट घ्यावे लागत नाहीत पण नवीन वाट निर्माण करायची असेल तर  खाच खळग्यातून मार्ग काढावा लागतो आणि हा मार्ग काढणाऱ्यांच खरा अर्थ कळतो अशी त्याची समाज होता. नेहमीच तो काहीतरी भन्नाट करण्याची कल्पना करीत असे, कल्पनेच्या लाटेवर तरंगत तरंगत तो विशाल सागरात विहार करीत असे आणि नेहमीप्रमाणे परिस्थिती त्याला वाकोल्या दाखवीत सप्न भंग करीत असे. म्हाताऱ्या आईवडीलांची जबाबदारी त्याच्यावर असल्याने आता त्याला शेती करण्याशिवाय पर्याय नव्हता. आता नोकरी करायची नाहीच जे काय करायचे ते शेतीतच, पण पावसाअभावी पडलेल्या दुष्काळामुळे त्याला पुन्हा नोकरी करावी लागत होती. अर्थात नोकरी तालुक्याच्या गावी असल्यामुळे त्याने ती पत्करली होती. गावाकडे जाण्यायेण्याची सोय नसल्यामुळे व्यवस्थापकाने त्याची रहायची व्यवस्था कामाच्याच ठिकाणी केली होती.
दिवस उजाडला आणि सुरु झाली ती कामाची धावपळ, लागलीच ऑफिसचा फोन खणाणला
“गणेशराव आहेत का..?” सोनल बोलली
“हो..बोलतोय..?” गणेश अडखळत उद्घारला.
गणेशराव मी तुम्हाला मेल केला आहे, तेवढा बघून घ्या आणि ज्या पोस्ट पाठविल्या आहेत त्या दुपारी १वाजेपर्यंत साहेबांच्या वेबसाईटवर अपलोड करा..! आणि पुढील सुचनासाठी स्काईपवर लॉगीन व्हा.. ”
सोनल अतिशय शांत व मृदूस्वरात सूचना करीत होती. गाण्याच्या भंगलेल्या खडकाळ हृदयामध्ये कर्णमधुर सुरांचा गुंजारव सुरु झाला होता.....!
गाण्याने सोनाल विषयी माहिती जाणून घेण्यासाठी सर्व सोशल नेटवर्कचा सहारा घेतला पण त्याला माहिती मिळू शकली नाही..
“श्रेयस सर, किती कर्मचारी आहेत हो तुमच्या कंपनी मध्ये” गणेश त्याच्या संगणकावर काम करीत असतांना बोलला.
“अकरा”
“लेडीज किती आहेत” शंकेची पाल चुकचुकू नये म्हणून गाण्याने मध्येच चहा पिणार का सगळेजण म्हणून विचारणा केली.
“गाणुभाऊ बिस्किटे पण मिळतील का?” अनिसने मिस्कीलपणे हासत विचारांना केली
“असू द्या फक्त चहाच मागवा” काकफळे उत्तरला.
गाण्याने श्रेयसला विचारलेला प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला. सायंकाळ झाली तसी प्रत्येकाची घरी जाण्यासाठी घाई झाली. श्रेयसने त्याचे कॉम्पुटर बंद केले व सगळ्यांना ही आपापले कॉम्पुटर बंद करण्यास सांगितले.
गण्याने संध्याकाळी जेवण संपवून त्याच्या खोलीतील लाइट बंद करून झोपण्यासाठी स्वप्नांची शाल अंगावर पांघरली. डोळे मिटताच त्याला एक शुभ्र वस्त्रे घातलेली अतिशय सुंदर स्त्री दिसली बहुदा ती परी असावी..हो नक्की ती परीच होती...तीने त्याचा हात धरला होता. ती त्याला खेचत होती एका सुंदर दुनियाकडे ते वेगळेच होते..तेथे गुलाबाचे सुंदर फुले होती. त्यांच्या दरवळामुळे वातावरण प्रसन्न झाले होते. थोडे पुढे जाताच असंख्य भरजरीवस्त्रालंकारीत अतिशय सुंदर स्त्रिया त्या परीला वाकून अदबीने प्रणाम करीत होत्या. आणि गाण्याकडे आश्चऱ्यांनी बघत होत्या. ती बहुतेक ह्या सर्व पऱ्यांची राणी असावी....हो राणीच होती ती..आणखीन पुढे गेल्यावर एक भरजरी सिंहासन दिसत होते ती गाण्याला तसीच ओढत घेऊन जात होती..आता तिचा हात जरा सैल झाला होता...ती गाण्याला सिंहासनावर बसण्याचा हाताने ईशारा करीत होती...आणि अचानक मोठ्याने धड.. धड.. आवाज सुरु झाला गाण्या पार भांबावून गेला होता..तो कर्कश आवाज कसला होता.. छे ते तर त्याच्याच छातीचे ठोके होते. हे काय होत आहे मला असे महणून गण्या जोरात किंचाळायला लागला...कोणीतरी त्याला मागे ओढत होते... तो मागे खेचला जात होता..परी न जाण्याचा ईशारा करीत होती....तो चालला होता..सर्व पऱ्यांनी त्याला एकाबाजूने पकडले होते तरी देखील तो मागे खेचला जात होता....आता मागे खेचण्याचा वेग जास्त झाला होता. परीच्या हातातून त्याचा हात केंव्हाच निसटला होता......त्यांच्या डोळ्यासमोर काळाकुठ्ठ अंधार पसरला होता..अगदी काळाकुठ्ठ..!
सोनेरी सूर्य किरणाचे तिरीप गाण्याच्या खोलीमध्ये पडल्यामुळे खोली प्रकशमय झाली. गण्या उठला सकाळची सर्व कामे आटोपून घाईघाईने तो ऑफिस मध्ये पोहचला होता..
अनिस, काकफळे, श्रेयस सर्वजण माझ्या आगोदर आले होते. दिवस कसे भराभर चालले होते. निवडणूक उद्यावर येवून ठेपली होती. आजचा सगळ्यांचा कामांचा हा शेवटचा दिवस असणार होता.
“आज सर्वांनी आपल्या कामांचे विवरणपत्र तयार करून दुपारपर्यंत गणेशरावकडे सादर करा. आणि गणेशराव तुम्ही ते सोनल जोशींना मेल करा.” श्रेयसने सगळ्यांना सूचना दिल्या.
नेहमीप्रमाणे ऑफिसचा फोन खणाणला “ गणेशराव मी सोनाल बोलतेय, सर्वांच्या कामांचे सगळे विवरणपत्र माझ्या मेल वर पाठवा. आणि हो उद्या निवडणूक असल्यामुळे आज तुमच्या सगळ्यांचा कामाचा शेवटचा दिवस असेल...तुम्ही खूपच चांगली मदत केली..त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार..गणेशराव आमच्या कंपनीमध्ये काम केल्यामुळे मिळालेल्या अनुभवावर भविष्यामध्ये तुम्हाला खूप चांगली संधी मिळू शकते...किंबहुना आमच्याकडे एखादा परत अशाप्रकारचा प्रकल्प आल्यास आम्ही सगळ्यात आगोदर तुम्हालाच संधी देऊ हे नक्की..बाय द वे कीप इन टच..”
“ हो नक्कीच..संधी मिळाल्यास मला देखील तुमच्या सोबत...म्हणजे तुमच्या कंपनीसोबत काम करायला नक्कीच आवडेल.” आणि गाण्याने शेवटचा निरोप घेतल्याप्रमाणे फोन ठेवला.
तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ऑफिसमध्ये सगळ्यांची एकमेकांना सोबत चांगली ओळख झाली होती.  आजचा सगळ्यांचा कामाचा शेवटचा दिवस असल्यामुळे ऑफिस मध्ये थोडे भावनिक वातावरण तयार झाले होते. सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि जो तो आपापल्या मार्गाने घरी जाण्यासाठी निघाला. गाण्याने त्याचे कपडे बॅगमध्ये कोंबले, आणि सगळ्यांचा निरोप घेऊन झपाझप पाउले टाकत बसस्टँड च्या दिशेने चालू लागला. रोजच्या सारखी आज बसस्टँड गर्दी होती. कलकलाट होता पण त्याला त्यामध्ये काहीतरी बदल झाला असल्याचा भास झाला. इथे येतांना जी उम्मेद होती ती जातांना नव्हती..
गाण्याने गाडी पकडली आणि एका मोकळ्या सीटवर जाऊन बसला पंधरा मिनिटे डबल बेलच्या प्रतीक्षेत असलेली गाडी सुरु झाली गाडीच्या चाके वेग धरू लागली आणि गाण्याच्या डोक्यातील विचारही..
माणसाच्या जीवनाला भावनेची किनार लाभली असल्यामुळे माणसांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो...आणि दुखःही..या दुनियामध्ये किड्यामुंग्याप्रमाणे हजारो लोकं जीवन जगात असतात, जीवनासाठी धावपळ करीत असतात...आणि जगण्याच्या या शर्यतीत कोणाचा तरी सहवास लाभतो, आणि नकळत त्या सहवासाचा त्याला त्याच्या नकळत सवय जडते आणि शेवटी एक वेळ अशी येते की त्याला तो सहवास अनिच्छेने सोडवा लागल्यामुळे असह्य वेदना होत असतात. क्षणभर आपणाला एखाद्या व्यक्तीची ओढ लागते, आता त्याच्या किंवा तिच्या शिवाय जगूच शकत नाही असे वाटते...पण हे सुद्धा बदलणार असते जसजशी वेळ पुढे सरकते तसतशी ह्या आठवणीची ठिगळे सुद्धा गळून पडतात....जीवनाचा गाडा हाकण्यासाठी संघर्ष हा कायम असतो...पुन्हा एक नवीन जाहिरात असते...नवीन नोकरी...आणि नवीन सहकारीही..!

Friday 1 July 2016

लोक कलावंत उपेक्षितच



 महाराष्ट्राला प्राचीन काळापासून अनेक परंपरा लाभलेल्या आहेत. शाहिरी, गोंधळी, भारुड तमाशा कीर्तन, बहुरूपी वाघ्या मुरळी, यासारख्या अनेक लोक कलांनी महाराष्ट्राची साहित्य परंपरा एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले आहे. मराठी साहित्य परंपरेत अण्णाभाऊं साठेंनी जवळजवळ सर्वच महत्त्वपूर्ण साहित्यप्रकार अत्यंत प्रभावीपणे हाताळला. कविता, लावण्या, शाहिरी, वग, लोकनाटय़ांपासून कथा, कादंबरी, प्रवास वर्णनात्मक लेखनापर्यंत. त्यांनी आपल्या साहित्यातून निर्माण केलेले नायक विपन्नावस्थेत असूनसुद्धा लाचार ठरत नाही. तर अत्यंत दणकट जीवन व्यक्त करतात. या लोक पारंपरेतूनच पूर्वी समाज प्रबोधन केले जात असे, ग्रामीण भागात यात्रा उत्सवा दरम्यान कीर्तन, नाटक वाघ्या मुरळीचे कार्यक्रम सादर होत असतात. आणि यामधूनच ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्यातील सुप्त गुणांना पैलूं पाडण्यासाठी व्यासपीठ निर्माण होते. ग्रामीण भागामध्ये आजही कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून समाज घडविण्याचा प्रयत्न करतात पण असल्या कार्यक्रमाना ज्येष्ठांचीच उपस्थिती असते तरुण वर्ग याकडे फार मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत नाहीत. नक्कीच याला आधुनिक जीवनशैली कारणीभूत असू शकते त्यामुळेच दान पावलं हो दान पावलं म्हणत भल्या सकाळीच शुद्ध आचरणाचा निस्वार्थ दानाचा आणि हरी भजनाचा उपदेश करणारा वासुदेव आज क्वचितच कधीतरी दिसतो. गावाकडच्या तमाश्यांच्या फडातील कलाकारांचे भवितव्य देखील अंधारमयच आहे. मौखिक परंपरेने चालत आलेली गाणी, अभंग, ओव्या, गवळणी आपल्या विशिष्ट लकबीत तालबद्ध रीत्या सादर करून एकप्रकारे समाज प्रबोधन करण्याचे काम हे कलावंत करीत असतात. आजच्या परिस्थितीत मात्र ह्या सर्व लोककला अखेरच्या घटका मोजीत आहेत असे म्हणायला हरकत नाही. शालेय विध्यार्थांच्या अभ्यासात पोवाडे, लोककलेविषयीचे साहित्य, बहिणाबाईच्या कविता, समाविष्ठ करून विध्यार्थांना त्याचे महत्त्व पटवून दिल्यास तो एक लोककला पुनरुज्जीवन मार्ग ठरू शकतो. आधुनिकतेच्या, शहरीकरणाच्या विळख्यात गुरफटत चाललेल्या अशा समाजाचा संस्कारक्षम परंपरकडे पाहण्याचा दृष्टीकोन मालिन होऊ नये यासाठी शासकीय व सामाजिक स्तरावरून सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. सध्या सोशल मिडीयामध्ये हॅश टॅश वापरून इव्हेंट ट्रेंड निर्माण केले जातात. याच माध्यमातून फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्क साइट्सवर तरुणांनी हॅश टॅश वापरून इव्हेंट ट्रेंड निर्माण केल्यास यासंबंधी समाजामध्ये जाणीव जागृती होऊ शकते. नावीन्यतेची कास धरावी पण इतिहासाचा संग्रह देखील असावा तरच ही कला आणि लोककलावंत तग धरू शकेल एवढे माञ नक्की....!